Tuesday, July 7, 2009

पंडित बिरजू महाराज

लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यात श्री अच्छन महाराजांच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आला.त्याचे नाव ब्रिजमोहन मिश्रा.बिरजू हे त्यांचे लाडातले नाव.आज आपण त्यांना पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो.महाराजजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ चा.नृत्य त्यांना वारसा हक्कानेच मिळाले होते.त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती.बालपणातच त्यांनी आपल्या वडलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली.मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही.महाराजजींच्या वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांच्या वडलांचा, श्री अच्छन महाराजांचा मृत्यू झाला.

पुढचे शिक्षण महाराजजींनी त्यांचे काका पंडित लच्छू महाराज आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडे घेतले.लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा.महाराजजींनी हे सगळे टीपकागदाप्रमाणे आत्मसात केले.थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्रयोग केले.त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते.ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून महाराजजींनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले.

महाराजजींचं बालपण अतिशय हालाखीत गेले.त्यांचे काका श्री लच्छू महाराज मुंबईत नृत्य गुरू म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या या पुतण्याला मुंबईला येण्याचा प्रस्ताव दिला.खूप मोठी संधी महाराजजींकडे चालून आली होती पण त्यांच्या आईने त्यांना अडवले. चित्रपटसृष्टीत नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळेल पण घराण्याचं काम अर्धवट राहील.घराण्याचा वारसा पुढे नेणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे! असे सांगून आईंनी महाराजजींना जणू त्यांच्या जीवितकार्याची जाणीव करून दिली.महाराजजींनीही आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानली.पुढे काही तुरळक सिनेमांचा अपवाद वगळता महाराजजी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले.

लहान वयात महाराजजींची उत्तम नर्तक म्हणून ख्याती होतीच पण या वयातच उत्तम गुरू म्हणूनही त्यांचा लौकीक होऊ लागला.त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली.’फाग-लीला’, ’मालती-माधव’, ’कुमार संभव’ ही काही नावे.या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या.अलिकडेच त्यांनी ’रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले.संपूर्ण देशभरात आणि विदेशात महाराजजींच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

महाराजजींचे नृत्य पहाणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो.त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच!मोराच्या गतीत जेव्हा महाराजजी मोराची चाल करतात तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटते.त्यांचं भावांगही तितकंच सहज सुंदर.एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर विविध रंगछटा लीलया साकाराव्यात त्याच सहजतेने त्यांच्या चेहेऱ्यावर भाव जिवंत होतात.सौंदर्यरसाच्या या उधळणीत रसिकमन चिंब भिजून जाते!

महाराजजींची प्रतिभा केवळ नृत्यापुरती सीमित नाही.ते एक उत्तम कवी आणि चित्रकार आहेत.तबला, पखावज वाजवण्यात ते वाकबगार आहेत.नृत्यासाठीही त्यांनी अनेक पद्यरचना केल्या आहेत.नवनवीन टुकडे, तोडे, तिहाया यांची निर्मिती तर अविरत चाललेली असते.खूप कमी कलावंत उत्तम शिक्षकही असतात.महाराजजींच्या ठायी हा दुग्धशर्करा योग जुळून आलेला दिसतो.’कथक केंद्र (दिल्ली)’ ते स्वत:ची संस्था ’कलाश्रम’ या प्रवासात त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार केले.बाल, प्रौढ अश्या प्रत्येकाला शिकवण्याची महाराजजींची खास हातोटी आहे.महाराजजींना ऐकताना आपण प्राचीन मंदिरातील कथकापुढे बसलो आहोत असे वाटते.अशा कलावंताला पूर्ण कलाकार म्हटलं तर वावगं ठरू नये.

महाराजजींना अनेक मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.देशाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून शासनाने त्यांचा गौरव केला.बनारस आणि खैरागड या विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.याशिवाय कालिदास सन्मान, ’नृत्य चुडामणी’, आंध्र रत्न, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा गौरविले आहे.

पूर्वप्रकाशन:अनंत वझे संगीत, कला व क्रिडा प्रतिष्ठान, कल्याण, स्मरणिका २५ जानेवारी २००९

No comments: